अजरामर जल साहित्य - माते नर्मदे


सरदार - सरोवर हे महाराष्ट्राचे उत्तर टोतावरचे, नर्मदा नदीवरचे धरण, या धरणामुळे केवळ देशातच नव्हे तर अंतरराष्ट्रीय पातळीवर, राजकारणात, समाजकारणात, पर्यावरण संरक्षणात, अंतरराष्ट्रीय नाणेनिधीत व अर्थकारणात प्रचंड उलथापालथ घडविली. या चक्रव्यूहचा शोध घेत पर्यायी विकसनीती काय असू शकते, याबद्दल विविध व्यक्तींची व संस्थांची मते तपासून पाहात, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी 'माते नर्मदे' हे पुस्तक लिलिले आहे.

पुष्कळदा असे घडते की, एखादी मोठी घटना आसपास घडत असते. मात्र, आपला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे त्याच्याशी संबंध नसतो. त्यामुळे त्या घटनेची ऊब, धग आपल्यापर्यंत पोहचत नाही. आपण तटस्थपणे, त्रयस्थपणे त्या घुसळणीपासून दूर राहात आपल्या मनात केवळ त्याची नोंद करित असतो.

अशाचप्रकारच्या नोंदी त्या घटनेचा पुरस्कार करणारे, तिचा विरोध करणारे, तिच्यापासून लाभ मिळविणारे, तिच्यापासून हानी पोहोचविणारे, तसेच ज्ञान, तंत्रज्ञ, पत्रकार, शास्त्रज्ञ, राजकारणी इ. देशोदेशीची मंडळी करून ठेवित असतातच आणि त्या घटनेला 1 - 2 दशके होऊन गेल्यानंतर तिचा सम्यक आवाका दर्शविणारे एक चित्र नजरेसमोर उभे राहते.

सरदार - सरोवर हे महाराष्ट्राचे उत्तर टोतावरचे, नर्मदा नदीवरचे धरण, या धरणामुळे केवळ देशातच नव्हे तर अंतरराष्ट्रीय पातळीवर, राजकारणात, समाजकारणात, पर्यावरण संरक्षणात, अंतरराष्ट्रीय नाणेनिधीत व अर्थकारणात प्रचंड उलथापालथ घडविली. या चक्रव्यूहचा शोध घेत पर्यायी विकसनीती काय असू शकते, याबद्दल विविध व्यक्तींची व संस्थांची मते तपासून पाहात, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी 'माते नर्मदे' हे पुस्तक लिलिले आहे.

पर्यावरण संरक्षण, की विकास किंवा विकास की पर्यावरण संरक्षण हा एक प्रचंड वादाचा मुद्दा गेली काही दशके जगभर थैमान घालतोय. डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर हे मुळचे शास्त्रज्ञ वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे त्यामुळे सरदार सरोवर धरणाला पाठिंबा देणारे म्हणजेच विकासवादी मंडळींची आणि पर्यावरणवादी धरणाला विरोध करणाऱ्या हिरव्या सेनेची (Green brigade) या दोन्ही बाजू त्यांना अभ्यासल्या, त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींना संस्थांच्या प्रतिनिधींना ते भेटले, त्यांच्या मुलाखती घेतल्या. वेगवेगळ्या संस्थांनी तयार केलेले अहवाल तपासले. आणि त्यावरून स्वत: कोणताही निष्कर्ष न काढता दोन्ही बाजू या लोकांसमोर मांडल्या. स्वत:चा विचारांचा कल कोणत्या दिशेने झुकतो हे ही त्यांनी लपवून ठेवले नाही. त्यातूनच आपल्या समोर साकारले 'माते नर्मदे'.

विश्वात एकच गोष्ट शाश्वत आहे ती म्हणजे बदल. हा बदल नेहमी चांगल्यासाठी व्हावा या दृष्टीने सर्वजण प्रयत्नशील असतात, व त्यालाच नाव दिले विकास. पूर्वीची अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे कृषीवर आधारित होती आणि पाणी हा त्याचा आत्मा होता. त्यामुळेच पाणी अडविणे, पाणी सांभाळणे आणि आर्थिक प्रगती हा सुमारे 5000 वर्षांपेक्षाही जास्त वर्षांचा इतिहास आहे. मात्र, माणसाने हा विकास साधतांना तो आत्मकेंद्रित केला. इतर सजिवांची फारशी काळजी केली नाही. किंबहुना आपल्यापूर्ती आजची निकड ही महत्वाची मानून ही विकासाची संकल्पनाही स्वत: भोवतीच मर्यादित केली. त्यातून निसर्गाला ओरबडणे सुरू झाले. 'आहेरे' म्हणजे ज्यांच्या जवळ आहे ते अधिक श्रीमंत झाले 'नाहीरे' वाले अधिकच गरीब झाले. त्यातून माणसा-माणसातली दरी खंदारू लागली.

17 व्या शकतात, थोरो या विचारवंताने प्रथमत: निसर्गाचे रक्षण व पर्यावरणाचे संरक्षण हा मुद्दा समोर मांडला. त्यातूनच पर्यावरणवाद्यांची मोठी चळवळ जगभर उभी राहिली.

सरदार सरोवराच्या निमित्ताने मेधा पाटकर, बहुगुणा, स्मितू कोठारी, बाबा आमटे इ. मंडळींचा एक गट शासकीय विकासाच्या धोरणांना कडाडून विरोध करणारा, शासनाच्या योजना नाकारणारा, विकासाच्या पर्यायी योजना हव्यात यासाठी आंदोलनांपासून, कोर्टबाजीपर्यंत सर्व मार्ग हाताळणारा किंबहुना बहू जी आदिवासी मंडळी या धरणामुळे विस्थापित होणार होती, त्यांचे आपण एकमेव कारणहार आहोत असे मानणारा.

डॉ. माधव चितळे, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ.भल्ला यासारख्या तंत्रज्ञांचा, वैज्ञानिकांचा दुसरा गट धरणाच्या मार्गांनी पुढे येतो. कारण पाणी मिळते, त्यासाठी काही हजार हेक्टर जंगल बुडाले, किंवा काही हजार लोक विस्थापित झाले तरी लाखो लोकांच्या कल्याणासाठी ही किंमत फार मोठी नाही. असे मानणारे व या प्रकल्पाचा हिरीरीने पुरस्कार करित तो पूर्ण व्हावा यासाठी अहोरात्र काळजी घेणारे व कष्ट करणारे.

मूळात हा प्रश्न मुळापासून समजून घ्यायला हवा, डॉ.दाभोळकरांनी बरीच आकडेवारी समोर दिली आहे. ते म्हणतात - भारत स्वतंत्र झाला तेव्हा बागायती खाली आलेले क्षेत्र हे एकूण शेतीखाली असलेल्या क्षेत्राच्या 19.60 टक्के होते. तर त्यापैकी सुमारे 55 टक्के क्षेत्र हे भूजलाच्या माध्यमातून पाणी मिळवित होते. देशाला प्रगती पथावर न्यायचे असेल तर मुलभूत अन्न, वस्त्र व पाणी हे तीन प्रश्न अग्रक्रमाने सोडवणे महत्वाचे होते. आणि म्हणून पंडित नेहरूंनी धरणांना आधुनिक तिर्थक्षेत्र म्हटले व धरण बांधणी मोठ्या प्रमाणावर हात घालायचे ठरविले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात ही धरणबांधणीची जी प्रगती झाली ती भाक्रा ते सरदार सरोवर अशीच बघावी लागले.

भाक्रा पूर्ण झाले त्याच्या बांधणीच्या वेळीही शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यातून हरियाणा व पंजाब ही राज्य सुजलाम् सुफलाम् झाली. त्यातून जलविद्युत निर्मिती हा एक नवा अध्याय देशात सुरू झाला. जगभरात साधारणत: 50 टक्के विद्युत ही जलविद्युत या स्वरूपात निर्माण होते. भारतात हे प्रमाण अवघे 26 टक्के इतके आहे. सरदार सरोवर या प्रकल्पाबद्दलच अगदी थोडक्यात सांगावयाचे तर वल्लभभाई पटेल यांनी 1947 साली हे धरण बांधावयाची कल्पना मांडली. 1969 मध्ये नर्मदा आयोगाची स्थापना करण्यात आली. त्या आयोगाने 10 वर्षांनी म्हणजे डिसेंबर 1979 मध्ये आपला अहवाल दिला.

भारत सरकारने त्यावर विचार करित करित 1987 मध्ये प्रकल्पाला मंजुरी दिली व त्याच्या खर्चाला 1988 मध्ये मंजुरी दिली. या योजनेनुसार उपलब्ध पाणी आणि तयार होणारी वीज ही संबंधित राज्यांनी म्हणजे गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांनी कशी वाटून घ्यावयाची हा ही निर्णय घेण्यात आला. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे सरदार सरोवरचा निर्णय, विचार हा नर्मदेवरील एक धरण असा करण्यात आलेला नव्हता. तर महेश्वर, ओंकारेश्वर, नर्मदासागर व सरदार सरोवर असा पूर्ण खोऱ्याचा एकत्रित विचार करण्यात आला होता. खरे म्हणजे एवढ्या गोष्टी झाल्यावर धरणाचे काम मार्गी लागायला हरकत नव्हती, परंतु अशावेळी पर्यावरणाचे आणि जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या हक्काचे प्रश्न समोर मांडीत मेधा पाटकरांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि पर्यायी विकास योजनांची मागणी केली.

या दोन्ही बाजू घेणाऱ्या गटांची भूमिका व त्यांच्यातील मतभेदाचे मुख्य प्रश्न काय होते, यावर दाभोळकरांनी सविस्तर चर्चा केली आहे आणि त्यामुळेच दाभोळकरांचे हे पुस्तक अमरसाहित्य कृती या सदरात मोडते असे माझे मत आहे. साहित्यकृती म्हणजे केवळ ललित साहित्य नव्हे त्याचा कथाकादंबरी नाटक या ललित आकृतीबंधामध्ये बांधून ठेवणेही योग्य नव्हे. एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठ तपासणी करणारा 'माते नर्मदे' सारखा ग्रंथ हा देखील मुलत: साहित्यकृतीत असतो. विशेषत: विचारांना खाद्य पुरवणारा त्यामुळेच आम्ही Silence Spring चा आढावा घेतला. त्याच्याच बरोबर विरूध्द बाजू घेवून 'माते नर्मदे' उभे आहेत.

पर्यावरणवादींनी उभे केलेले मुख्य प्रश्न होते सहा -
1. धरणे गाळाने भरतील व निकामी होतील.
2. धरणांमुळे त्या भागात भुकंप होऊ लागतील.
3. पर्यावरणाची प्रचंड हानी होईल.
4. अनेक लोक विस्थापित होतील. त्यामुळे त्यांचे आर्थिक, मानसिक व व्यावसायिक नुकसान होईल.
5. मोठी धरणे बांधण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होईल
6. मोठ्या प्रमाणावर जमीन पाण्याखाली जाईल, तसेच धरणातील अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यामुळे जमिनी पाणथळ होतील व खारट होतील.

या प्रत्येक मुद्द्याचा तात्विक पातळीवर विकासवादी मंडळी काय उत्तरे देतात याचीही नोंद माते नर्मदे मध्ये सविस्तरपणे घेतलेली आहेत. ती खालीलप्रमाणे -

1. प्रतिवाद - धरणांचे नियोजन करतांना त्यात गाळ वाहून येईल ही गोष्ट गृहीत धरलेली असते. त्यामुळे धरणाची जेवढी उंची त्यापैकी 1/3 भाग हा गाळ साठेल असे धरून धरणाची पाणी साठवण्याच्या ती क्षमता काढण्यासाठी मोजला जात नाही. वरची 2/3 उंची एवढीच धरणाची पाणी साठवण्याची क्षमता त्यातच सुरूवातीचे काही वर्षे जास्त प्रमाणावर गाळ आला तरी हळूहळू ती प्रक्रिया स्थिरावते. त्याचप्रमाणे पाणलोट क्षेत्रात गाळ थांबवण्यासाठी catchment treatment पध्दतीने गाळ रोखण्याची कामे केली जातात. व त्यामुळे गाळ येणे कमी होते.

आधुनिक संशोधनानुसार खाली साठलेल्या गाळात काही रसायने मिसळून प्रचंड दाबाने हवा घुसवली तर सर्व गाळ ढिला होतो. व पाण्याबरोबर वाहून जाऊन धरण पुन्हा गाळ विरहित होऊ जास्त शकते. त्यामुळे खूप काळजी करावी असा हा मुद्दा नाही.

प्रश्न 2 : तीस मोठी धरणे, 135 मध्यम आकाराची धरणे व 3 हजार छोटी धरणे यांचा अभ्यास केला तर जगभर विखूरलेल्या या धरणांपैकी फक्त 1 टक्का भागात भूकंप आहे. त्यापैकी केवळ 10 -12 ठिकाणी ही भूकंपाची तिव्रता 4.65 टक्के एवढी होती व एकाही ठिकाणी भुकंपामुळे धरण फुटले असे घडले नाही. 1967 मध्ये कोयना धरणाला काही तडे पडले होते. तेही ग्राऊटींगच्या सहाय्याने यशस्वीपणे बंद करता आले.

पर्यावरण वाद व परिसर याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व ओतायला तयार असलेला एक कडवा अतिरेकी हिरवा गट (Deep ecologist green brigade) जगात सर्वत्र लढा द्यायला सज्ज झाला आहे. थोरो रेचेल कार्सल, आर्नेनेसयांच्यापासून हा विचार सर्वत्र पसरला. थोडक्यात सांगावयाचे तर हा विचार असा -

अ. निसर्गातील सर्व विविधतेला, अणू- रेणूला, स्वत:चे मूल्य व जीवन आहे. या साऱ्या गोष्टींना एक स्वयंभू स्थान व जीवन आहे.
ब. आजकाल आपण जी मूल्य मानतो, ती केवळ मानवापूरती मर्यादित ठेवणे हे चुकीचे आहे. ती सर्व सजीव - निर्जीव निसर्गाला लागू असलेली सर्व व्यापी हवी.
क. मानवाची इतर अमानवी जगातील ढवळाढवळ ही असह्य व निर्गुण आहे. जी सर्व सजीव - निर्जीवांना उपयोगी पडते ती म्हणजे - साधनसामग्री. त्यामुळे प्रदूषण हाताळणे हे भौतिक विकासापेक्षा अनंतपटीने अधिक महत्वाचे आहे. जीवन व त्याची मूल्य तपासतांना त्यात विविध प्रकारचे प्रवाह, डोंगर यांचाही समावेश आहे. त्यामुळे नदीलाही जगू देणे हे कर्तव्य आहे. नदीचा प्रवाह म्हणजे तिचे जीवन आणि नदीवरचे धरण तिचे मरण हे आपण ओळखले पाहिजे.

आपले हे विचार सिध्द करण्यासाठी उपलब्ध आकडेवारीतून आपला विचार सिध्द होईल अशी आकडेवारी पुढे टाकणारा एक विचारवंतांचा गट हाही त्याच्याबरोबर असतो. व त्यामुळे उपलब्ध आकडेवारीच्या जंजाळ्यातून खरे काय आणि खोटे काय, ग्राह्य काय आणि त्याज्य काय हे सामान्य माणसाला उमजत नाही. त्यातूनच green house effect, ओझोनचे कवच, मिथेन वायू हवेत वाढणे, कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढणे, तापमान वाढ अशा अनेक गोष्टी घडत असतात.

या सर्वच गोष्टी गंभीरपणे विचारात घेतल्या पाहिजे त्याचे परिणाम टाळावेत म्हणून तसे उपायही योजले पाहिजेत. हे मांडतांना दाभोळकर म्हणतात, जेवतांना जीभ चावली गेली तर कोणी तीच चाऊन खाऊन टाकत नाही. त्यामुळे विकासवादी गटाचे जे मत ते विचारात घ्यावे. हे मांडतांना डॉ.आपल्या समोर पाण्याच्या उपलब्धतेची आकडेवारीच मांडतात. ते म्हणतात, भारतातील लागवडी योग्य जमीन 18 कोटी 60 लाख हेक्टर आहे आणि आपल्याकडे सरासरी 40 कोटी हेक्टर मीटर एवढे पाणी मिळते. या पाण्यापैकी आपण जास्तीतजास्त 6 कोटी 90 लाख हेक्टर मीटर एवढेच पाणी अडवून वापरू शकतो. हे प्रमाण सरासरी 18 टक्के एवढेच आहे. त्यामुळेच पर्यावरणाची पुरेशी काळजी घेतांना सुध्दा जास्तीतजास्त प्रमाणावर पाणी अडवले जायला हवे.

ड. मोठ्या धरणांसाठी लागणारा खर्च - आणि त्याऐवजी 10 धरणे बांधली तर त्यासाठी लागणारा खर्च तसेच त्यातील उपलब्ध पाणी याचा हिशोब मांडून दाभोळकर म्हणतात. मोठ्या धरणासाठी हेक्टरी रूपये 600 एवढा खर्च लागत असून तर लहान धरणासाठी रूपये 933 प्रति हेक्टर एवढा वाढत होता. (ही आकडेवारी 1971 ची किंमत धरून काढली असून सध्या हा खर्च हेक्टरी 6 हजार एवढा लागतो) मात्र, ही धरणे बांधल्यामुळे आपले अन्न - धान्याचे उत्पन्न 250 लाख टन या पेक्षाही पुढे गेले आहे व आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत ही बाब नजरेआड करता येणार नाही.

इ. मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्यामुळे काही लोकांनी त्याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करणे व त्यातून जमिनी पाणथळ व क्षारयुक्त होणे हे घडते. पण हा दोष पाण्याचा नाही वापरणाऱ्या माणसाचा आहे. एकदा चूक कळल्यावर तो ती दुरूस्त करू शकतो.

ई. जलविद्युत निर्मितीचे भारतामध्ये प्रमाण हे अतिशय अल्प असणे याची कारणे मांडतांनाच धरणाचा आर्थिक लाभ (cost benefit ratio) याबद्दलही डॉ.दाभोळकर सविस्तर विवेचन करतात. त्यातल्या आकडेवारीच्या जंजाळ्याचा मार्गातून आपल्यासमोर वस्तुस्थिती स्पष्टपणे मांडतात.

3. मात्र सरदार सरोवराचा प्रश्न एैरणीवर आला व त्यामागचा कळीचा मुद्दा म्हणजे पुर्नवसन. ज्यांची घरे, जमिनी या पाण्यात जाणार होत्या त्यांचे व्यवस्थित पुर्नवसन व्हावे या मुद्द्यावरून शासन आणि आंदोलन दोघांचेही मत सारखेच होते. प्रश्न होता तो मार्गाबद्दल व एकमेकांवर असलेल्या अविश्वासाबद्दल. यातूनच ह्या चळवळीने मूळ धरले, ती रूजली, फोफावली आणि एक नीरगाठ होऊन बसली. सरकारने जे देऊ केले ते कागदावर आकर्षक होते. तर आंदोलकांनी जे मागितले चे वास्तवाच्या पातळीवर पटणारे होते. मात्र या सगळ्यातून देशाच्या विकासाची दिशा कोणती असावी, पर्यायी विकासाची पध्दत म्हणजे काय ? पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण विकासाचा मार्ग शोधून आहे त्या स्थितीत राहणे पसंत करणार काय ? असे अनेक प्रश्न समोर आहेत.

लोकशाही राज्यपध्दती हे आपले बलस्थान त्याचबारेबर त्याच्या मर्यादाही कामाच्या गतीवर अंकुष ठेवतात. 1947 साली याची कल्पना मांडली गेली त्याचे काम सुरू व्हायला 1987 उजाडावे लागले. आणि आज 2013 मध्येही ते 100 टक्के पूर्ण झालेले नाही.

शासन त्यांची धोरणे त्याविरूध्द जलआंदोलने लोकशाही एकवटणे या सगळ्या बाबी अधोरेखित करणारा सरदार सरोवर हा अग्रस्थानी असलेला प्रकल्प आहे. लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या शंका दूर करून, त्यांच्या अडचणी सोडवून, विकासाची कामे नियोजित गतीने मार्गस्थ ठेवणे हा मोठ्या कसोटीचा मार्ग आहे. दाभोळकरांना तर शंका येते की, विस्थापित झालेल्या आदिवासींमधील पुरूषार्थ जागवित, त्यांना विज्ञाननिष्ठ, बुध्दिमान वरिष्ठ बनवण्याची प्रतिज्ञा करित, रामाच्या ममतेने हा प्रश्न सोडवावा लागेल.

लेखक म्हणतात, माणसाच्या गरजा व अपेक्षा आणि सद्यस्थिती यांना जोडणारा हा रामसेतु आहे. माझे काय शेपटीत अडकवून आणलेल्या वाळूचे काही कण टाकण्याएवढेच. हे वाळूचे कण देखील आम्हा वाचकांच्या डोळ्यात अंजन घालायला पुरेसे आहेत.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading