पुणे कात्रज क्लबचा जलसंधारण प्रकल्प

16 Apr 2017
0 mins read

बलवड आणि गुहिणी येथील कामाचा आरंभ थोड्याच दिवसात करण्याचा क्लब चा मानस आहे. स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे रोटरी चे एक मुख्य उद्दिष्ट आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजने ग्रामीण भागातील शाळांची हि गरज ओळखून तीन शाळात पाण्याचे फिल्टर्स बसवले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्याचा हा प्रयत्न क्लब तर्फे करण्यात आला आहे. जवळ जवळ 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.

तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला अन्न पुरवण्यातच मानवतेचे सर्वप्रथम दर्शन आहे. मनुष्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पाण्याचे संधारण, संवर्धन केले तरंच खर्‍या अर्थाने या सृष्टीचे संवर्धन होईल.

शेतीप्रधान असलेला आपला भारत देश आणि बहुसंख्येने असलेला बळीराजा सर्वस्वी वरुणराजाच्या कृपेवरच आपले आयुष्य काढत आहे. यामुळे मोसमात पडलेल्या पावसाच्या प्रमाणाइतकेच नंतर केलेल्या जलसंधारणाचे महत्त्व आहे हे सिद्ध झाले आहे.

जलसंधारणाचे, जलसंवर्धनाचे महत्त्व माहीत असूनही पिढ्यानपिढ्या असलेल्या दारिद्र्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्यावरील उपाय आमलात आणू शकत नाहीत. यामुळे आलेल्या नैराश्यातून मोठ्याप्रमाणात असलेल्या शेतीचे मालक असूनही काहीजण शहरी भागात मोलमजुरी करण्यास प्रवृत्त होतात आणि काहीजण दुर्दैवाने मृत्यूला जवळ करतात.

शहरी भागातील दानशूर, तज्ञ व्यक्तींनी या पिडीत समाजबांधवांना मदत करून, त्यांचे प्रबोधन करून त्यांना प्रोत्साहन देणे हाच या समस्यावरील उपाय !

रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजनेही अनेक उपक्रमाद्वारे गरजू गावांना जलसंधारणाची मदत केली आहे.

उपक्रम 1 : गावांचे सर्वेक्षण


नैसर्गिक विषमता असलेला ‘वेल्हे’ भाग हा निवडण्यात आला. डोंगरी दुर्गम भाग, पुण्यापासून फक्त 60 कि.मी. दूर असूनही अजूनही विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित भाग. एकीकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे 3-4 महिने दुष्काळ अशा विदारक परिस्थितीने गांजलेला हा भाग. विकासाच्या मार्गातील प्रमुख अडचण म्हणजे फक्त आणि फक्त पाण्याची समस्या. अशा वेल्हे तालुक्यात जलसंधारणाचे कार्य करण्याचे कात्रज रोटरी क्लब ने ठरविले आणि स्थानिक समाजसेवी संस्थच्या मदतीने घिसर, वारोती, बलवड, गुहिणी अशा सुमारे 5-6 गावांचे प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण केले.

उपक्रम 2 : पाण्याची टाकी बांधून दिली


‘मांगदरी’, पुण्यापासून 20 कि.मी अंतरावरील वेल्हे तालुक्यातील एक छोटेसे गाव. पिण्याच्या पाण्याची साठवणूक नाही; जनावरांसाठीही पाणी नाही. अशा अडचणींमुळे गावातील प्रत्येक तरुण अर्थार्जनासाठी शहरात जावून मोल मजुरी करीत होता.त्यामुळे गावपण हरवलेल्या या खेड्यातील जीवनचैतन्य नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले होते.

रोटरी क्लब कात्रजने ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर उपाय म्हणून तब्बल 30,000 लि. क्षमतेची पाण्याची टाकी बांधून दिली. त्याचबरोबर गावापासून काही अंतरावर असलेल्या या टाकीतून गावापर्यंत पाईपलाईन टाकून मांगदरी गावातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्‍न सोडवला.

उपक्रम 3:


‘घिसर’ गावात विहीर बांधकाम वेल्ह्यापासून 16 कि.मी. दूर असलेल हे एक छोटस गाव; 600 लोकवस्ती; भातशेती हेच एक अर्थार्जनाचे साधन; पावसाळ्यात प्रचंड पाउस तरीही 4 महिने पाण्याचे दुर्भिक्ष; पिण्याच्या पाण्यासाठी 5 कि.मी. ची रोजची पायपीट.

सर्वेक्षणातून निवडलेल्या या गावातील समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन कात्रज रोटरी क्लबने 25 फूट व्यासाची व 30 फूट खोली असलेली विहीर बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला. ग्रामसहभाग व तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या स्थानिक सेवाभावी संस्थेच्या मदतीने दि. 14 फेब्रुवारी 2017 रोजी विहीर बांधकाम सुरु झाले आणि येत्या काही दिवसात ते पूर्णत्वास जाणार आहे.

बलवड आणि गुहिणी येथील कामाचा आरंभ थोड्याच दिवसात करण्याचा क्लब चा मानस आहे. स्वच्छ आणि शुद्ध पाणी हे रोटरी चे एक मुख्य उद्दिष्ट आहे.

रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजने ग्रामीण भागातील शाळांची हि गरज ओळखून तीन शाळात पाण्याचे फिल्टर्स बसवले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्याचा हा प्रयत्न क्लब तर्फे करण्यात आला आहे. जवळ जवळ 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading