सी एस आर मधून कार्यक्षम जलक्रांती


२०१५ मध्ये पुन्हा एकदा भयंकर दुष्काळ पडला. मराठवाड्याची दिवसेंदिवस वाईट होणारी अवस्था सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडताना दिसून आले. निसर्गाची अवकृपा असलेल्या मराठवाड्यात पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नव्हते. शैक्षणिक पंढरी समजल्या जाणार्‍या लातूर शहरात पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. रेल्वेने पाणी देण्याची इतके दिवस नुसती चर्चा होती पण मिरज ते लातूर रेल्वेने पाणी आणून सार्‍या जगासमोर उदाहरण दाखवून दिले गेले.

ऐतिहासिकदृष्ट्या जगाच्या नकाशावर मान्यता पावलेल्या औरंगाबादची गेल्या ५० वर्षांत औद्योगिक नगरी म्हणूनही ओळख झाली आहे. जगात कुठलीही टूव्हिलर असो की फोरव्हिलर औरंगाबादमधून या गाड्यांचे पार्ट तयार करून दिले जातात. औरंगाबाद व परिसरातील नागरिकांनी प्राथमिक गरजांची पूर्तता करून देण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यान्वित असते. पण निसर्गाने पाठ फिरविली तर सगळेच हतबल होतात. दुष्काळ हा औरंगाबादच्या पाचवीला पूजलेला. कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत अनेक कंपन्यांकडून समाजोपयोगी कामे केली जातात. ४८ वर्षे जुन्या चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए) ने २०१६ च्या दुष्काळात औरंगाबाद, पैठण तालुक्यात नदी, नाले खोलीकरण, रूंदीकरणाची कामे केली. त्यामुळे ओसाड भागात अक्षरशः नंदनवन फुलले आहे.

मराठवाड्यात उद्योगांची कास धरली गेली त्याला ४८ वर्षे उलटून गेले. रेल्वेस्टेशन परिसरातील औद्योगिक वसाहतीत उद्योगांची मुहुर्तमेढ रोवली गेली. उद्योजक वाढत गेले आणि त्यांची संघटना स्थापन झाली. जुनी मराठवाडा इंडस्ट्रिज असोसिएशन पुढे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अ‍ॅग्रीकल्चर नावाने ओळखली जाऊ लागली. लघु, मध्यम, मोठे व बहुराष्ट्रीय उद्योग औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात उभे राहिले. बजाज, व्हिडिओकॉन सारख्या मोठ्या कंपन्यांमुळे हजारो लघुउद्योजक वाळूज, चिकलठाणा, चितेगाव, शेंद्रा परिसरात उभे राहिले. विभागाचा औद्योगिक विकास होताना सर्वांगीण विकास झाला पाहिजे, ही सर्व उद्योजकांची भावना होती. साहजिकच शहर व परिसराच्या विकासासाठी उद्योग पुढे येऊ लागले. स्कोडा, एंड्रेस हाऊजर सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या औरंगाबादेत याव्यात, यासाठी सीएमआयएने पुढाकार घेऊन महत्वाची भूमिका बजावली.

मोठे उद्योग आले की तिथे काम करण्यासाठी बाहेरून अधिकारी येणार, त्यांच्या पाल्यांना चांगले शिक्षण, कुटुंबीयांना मनोरंजनाची साधने उपलब्ध व्हावीत हे अपेक्षित असते. त्याप्रमाणे औरंगाबादेत चांगली शाळा, चांगले रुग्णालय असावे यासाठी सीएमआयएने सातत्याने पुढाकार घेतला. २०१२ मध्ये औरंगाबादकरांना भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले. नुसते औरंगाबाद नव्हे तर मराठवाडा प्रदेशच अडचणीत आला होता. पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत होती. शेतीची भीषण अवस्था, शेतकरी चिंतेत आणि पर्यायाने शेतकर्‍याचे कुटुंब आर्थिक अडचणीत अशी विचित्र परिस्थिती होती. आर्थिक अडचणींमुळे शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षण कसे द्यायचे ? असा प्रश्न होता. इथे पोटाचे खळगे भरायला पैसे नाहीत तिथे शिक्षण कुठून देता येणार ? ही परिस्थिती पाहून शेतकर्‍यांची मुले आपापल्या घरी परतली होती. सीएमआयएने या काळात अन्य संघटनांना सोबत घेऊन १२०० विद्यार्थ्यांना तीन महिन्यांसाठी धीर दिला. निधी जमा करून या विद्यार्थ्यांची जेवणाची, राहण्याची सोय केली. त्या मुलींना प्राधान्य दिले गेले. दुष्काळात मदत तर झाली पण अनेकांचे संसार वाचविण्यात सीएमआयएला यश आले.

दोन वर्षे उलटत नाहीत तोच २०१५ मध्ये पुन्हा एकदा भयंकर दुष्काळ पडला. मराठवाड्याची दिवसेंदिवस वाईट होणारी अवस्था सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडताना दिसून आले. निसर्गाची अवकृपा असलेल्या मराठवाड्यात पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नव्हते. शैक्षणिक पंढरी समजल्या जाणार्‍या लातूर शहरात पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. रेल्वेने पाणी देण्याची इतके दिवस नुसती चर्चा होती पण मिरज ते लातूर रेल्वेने पाणी आणून सार्‍या जगासमोर उदाहरण दाखवून दिले गेले. या दुष्काळात सीएमआयएच्या माध्यमातून मोठे काम करायचे यासाठी संघटनेने सीएसआर निधी व अन्य स्त्रोतांमधून काही योजना राबविण्याचे ठरविले. ज्येष्ठ उद्योजक, सीएमआयएचे माजी अध्यक्ष राम भोगले, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यात पुढाकार घेतला आणि संघटनेला मार्गदर्शन केले. औरंगाबाद, पैठण आणि फुलंब्री तालुक्यांतील अनेक गावांत नदी, ओढा, नाले खोलीकरण, रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली. एरव्ही अशी कामे करताना आकडेवारी फुगविली जाते. सरकारी काम म्हटले की त्यातील दर्जाच्या बाबत शंका निर्माण होते पण सीएमआयएच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या कामाचे बजेट योग्य पद्धतीने ठरविले गेले. गावकर्‍यांचा सहभाग घेऊन भविष्यात ही कामे गावासाठी किती महत्वाची आहेत, हे पटवून देण्यात आले.

योग्य जनजागृती झाल्यामुळे कामे झपाट्याने पूर्णत्वाकडे गेली आणि पावसाळ्यापूर्वी वाघळगाव, बोरगाव,निमखेडा, ढवळापुरी,माळेवाडी, बिडकीन, पाचोड, बिल्डा, फरशी फाटा, महाल किन्होळ, भालगाव, जटवाडा, वाहेगाव, आडगाव भूमी, गोलटगाव, झाल्टा, चिकलठाणा आदी १३ गावांमध्ये नदी, नाले रुंदीकरणाचे मोठे काम पूर्ण झाले. सुदैवाने गेल्यावर्षी या परिसरात चांगला पाऊस झाला आणि सर्व ठिकाणी जवळपास १४७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला. पाणी एकाच ठिकाणी साठून राहिल्याने ते परिसरातील विहिरींमध्ये झिरपले गेले. जमिनीतील पाणीपातळी वाढली आणि अनेक गावांतील पाणीटंचाई दूर झाली. यंदा मार्च महिन्यापासून भीषण ऊन सुरू झाले आहे.

त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे. पण सीएमआयएच्या पुढाकाराने झालेल्या कामांच्या गावात मात्र अजून तरी टँकरची गरज लागलेली नाही. या कामासाठी औरंगाबाद व परिसरातील उद्योगांनी सढळ हाताने मदत तर केलीच पण जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, झेन स्टार ज्वेलरी, हार्मन फिनोकेम, छत्रपती संभाजी राजे उद्योग लिमिटेड, एआयटीजी ग्रुप, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स, अजंठा फार्मा, फ्रिगोरीफिको अलाना, हिंदुस्थान कंपोजिटस, आर.एल. स्टिल्स,एनकोअर, सोम अ‍ॅटो आदी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली. औद्योगिक विकासासोबत परिसरात विकासाची संकल्पना योग्य पद्धतीने राबवून सीएमआयएने राज्याच्या नव्हे तर देशाच्या औद्योगिक क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.

श्री. गिरप्रितसिंग बग्गा, अध्यक्ष, सी.एम.आय.ए.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading