अंबरनाथ शहरातील भूजल प्रदूषित - एक अभ्यास


भूजल पातळीतले काही घटक हे WHO आणि BIS ने दिलेल्या मानकानुसार स्वीकार्य असे आहेत. अशा स्त्रोतांवर अजून तरी औद्योगिकरणाचा तसेच वसाहतीकरणाचा इतकासा परिणाम दिसून येत नाही. परंतु भूजलातले काही घटक हे WHO, BIS आणि CPCB, आणि ने दिलेल्या पातळीच्या पार गेलेले दिसतात, त्या भागांमध्ये काही रासयनांचा परिणाम हा भूजलावर झालेला दिसून येतो, शहरीकरण तसेच औद्योगिकरणामुळे, भूजलातील पाण्यावर हा परिणाम दिसून येतो, जी अतिशय गंभीर बाब आहे.

नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये, भूजल हे एक महत्वाचे संसाधन आहे. जमिनीमध्ये, खडकामध्ये सापडणार्‍या पाण्याला भूजल असे म्हणतात. पूर्वीच्या काळापासून भूजलाचा वापर मानव आपल्या वापराकरता करत आलेला आहे. शेती करता, घरगुती कामाकरता, तसेच औद्योगिक कामातसुध्दा भूजलाचा उपयोग केला जातो. भूजल हे जरी वर दिसत नसले तरीही अतिशय उपयुक्त असे संसाधन आहे.

जगातील प्रत्येक खंडामध्ये भूजलाचा वापर रोजच्या दैनंदिन वापराकरता केला जातो. आशिया खंडामध्येही या संसाधनाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. भारत, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि चीन अंदाजे ३०० बिलियन m³ भूजल वर्षभरामध्ये वापरतात. मुख्यत: भूजलाचा वापर शेतीकरता केला जातो. भारतातल्या ६० टक्के खेड्यांमध्ये ट्यूब वेल चा वापर केला जातो.

दिवसेंदिवस मानवाच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याचा उपयोगही वाढत चालला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत असलेली नदी, तलाव यावरील ओझे वाढतच चाललेले आहे, अशा परिस्थितीत भूजल हे अतिशय महत्वाचे आहे. मानव ही संसाधने त्याच्या उपयोगाकरता वापरतोच परंतु अति उपयोग तसेच औद्योगिकरणामुळे विविध रसायने या जलस्त्रोतामध्ये सोडली जातात, आणि पुढे ही रसायने जमिनीतून शोषली जावून, भूजलाच्या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. भारतातील बर्‍याच राज्यांमध्ये भूजल प्रदूषणाच्या समस्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ क्षेत्राच्या भूजल चाचणीचा अभ्यास केला आहे.

अंबरनाथ हे शहर मुंबई पासून सुमारे ६० कि.मी अंतरावर आहे. अक्षांशानुसार १०.१४ उत्तररेखांश ७३.८ पूर्व रेखांश आहे. समुद्रसपाटीपासून ६३ फूट उंचीवर, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत वसलेले शहर असून, या शहराचे एकूण क्षेत्रफळ ३७९९.७८ हेक्टर इतके आहे. अंबरनाथ हे एक औद्योगिक शहर असून या शहरांमध्ये १३८.५० कि.मी लांबीचे रस्ते आहेत. अंबरनाथ शहरातून रेल्वे मार्गक्रमण करीत असल्यामुळे शहराचे दोन विभागात विभाजन झालेले असून, शहरामध्ये लहान - मोठी मंदीरे, चर्च, मशीद, दर्गा , गुरूद्वारा अशी प्रार्थना स्थळे आहेत. अंबरनाथ शहरातील शिवमंदीर जगप्रसिध्द आहे, शहरामध्ये नगरपरिषद दवाखाना, खाजगी दवाखाना, पेट्रोल पंप, बँक इत्यादी तसेच सार्वजनिक सुविधा उपलब्ध आहेत. अंबरनाथ शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व एम.आय.डी.सी यांच्याकडून पाणी पुरवठा केला जातो.

२०११ च्या जणगणनेनुसार अंबरनाथ शहराची लोकसंख्या २,५३,४७५ होती, यामध्ये पुरूष संख्या १,३२,५८२ आणि स्त्रियांची १,२०,८९३ इतकी होती.

अंबरनाथ शहर हे औद्योगिक शहर म्हणून विकसित झालेले असून एकूण क्षेत्रापैकी सुमारे १७.७३ टक्के एवढे क्षेत्र औद्योगिक वापराखाली येत असून, शहराच्या मध्यमवर्ती ठिकाणी, औद्योगिक पट्ट्यात विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. एम.आय.डी.सी ने सांडपाणी प्रक्रिया व नि:सारण प्रक्रिया केंद्रे उभारलेली नसल्याने, सदर रासायनिक सांडपाणी वालधुनी नाल्यात सोडले असून, सदर नाला हा उल्हास नदीला मिळत आहे. (अंबरनाथ नगरपालिका पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल २००९-१०)

अंबरनाथ शहरामध्ये २ जलशुध्दीकरण केंद्र असून १ मलशुध्दीकरण प्रकल्प आहे ज्याची क्षमता २८ एम.एल.डी असून तो वडोलगावात आहे. हा प्रकल्प लोकसंख्येच्या मानाने, क्षमतेच्या तुलनेत लहान आहे. मलशुध्दीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया झाल्यानंतर, प्रक्रिया झालेले पाणी हे वालधुनी नदीमध्ये सोडले जाते.

अंबरनाथ शहरामध्ये ३ औद्योगिक क्षेत्र आहेत -

१. अंबरनाथ केमिकल झोन.
२. अंबरनाथ चिळलोळी- मोरिवली झोन
३. अतिरिक्त अंबरनाथ, अनंतनगर झोन

वरील औद्योगिक क्षेत्रामध्ये ८५९ उद्योग आहेत (२००९ - १० पर्यावरण - स्थितीदर्शक अहवालानुसार) अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये मुख्यत: अतिरिक्त औद्योगिक वसाहत तसेच रासायनिक उद्योग स्थित असलेली औद्योगिक वसाहत व चिळलोली - मोरिवली येथे उद्योग कार्यरत आहे. यापैकी रासायनिक प्रभाग येथील स्थित उद्योगांनी, स्वत:ची प्राथमिक तसेच प्रथमिक स्तरीय व द्वितीय स्तरीय सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारलेली आहे व सदर प्रक्रिया केलेले सांडपाणी पुढील प्रक्रिया करण्यासाठी संयुक्त सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये प्रतिदिन सोडले जाते. या संयुक्त सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता ०.२५ MLD आहे व प्रक्रिया झालेले / केलेले सांडपाणी वालधुनी नदीत सोडले जाते.

चिळलोली - मोरिवली स्थित असलेल्या कारखान्यांनी सुध्दा प्राथमिक व द्वितीय स्तरीय स्वरूपाची सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बसवलेली आहे, व सदर प्रक्रिया केलेले सांडपाणी पुढील प्रक्रियेसाठी, स्थित संयुक्त सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणे मध्ये पाठवले जाते. सदर प्रक्रिया केलेले सांडपाणी वालधुनी नदीत सोडले जाते. पुढे ही नदी उल्हास खाडीत मिसळते.

चिळलोली - मोरिवली औद्योगिक वसाहत अंबरनाथ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेली असून, या सभोवतालच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या स्थित झालेली दिसून येते, यामध्ये मध्यमवर्गीय वसाहती तसेच झोपडपट्टी क्षेत्राचा समावेश होतो, आणि झोपडपट्टीच्या भागामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. हा प्रदेश अंबरनाथ शहराच्या मध्यमर्ती ठिकाणी असल्याने आणि सभोवताली मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असल्या कारणाने या क्षेत्राची संशोधनाकरता निवड केली. २ वर्षाकरता (जानेवारी २०१३ ते जानेवारी २०१५) या कालवधीमध्ये चिळलोली - मोरिवली औद्योगिक क्षेत्राच्या, आजूबाजूला असलेल्या वसाहतींचा (मध्यमवर्गीय तसेच झोपडपट्टी) १२ भूजल स्त्रोतांचा (विहीरी, हातपंप तसेच बोअरवेल) यांची २ वर्षाकरता गुणवत्ता चाचणी केली आणि त्यामध्ये सापडलेल्या बाबी पुढीलप्रमाणे - थोडक्यात वर्णन केलेल्या आहे.

भूजल पातळीतले काही घटक हे WHO आणि BIS ने दिलेल्या मानकानुसार स्वीकार्य असे आहेत. अशा स्त्रोतांवर अजून तरी औद्योगिकरणाचा तसेच वसाहतीकरणाचा इतकासा परिणाम दिसून येत नाही. परंतु भूजलातले काही घटक हे WHO, BIS आणि CPCB, आणि ने दिलेल्या पातळीच्या पार गेलेले दिसतात, त्या भागांमध्ये काही रासयनांचा परिणाम हा भूजलावर झालेला दिसून येतो, शहरीकरण तसेच औद्योगिकरणामुळे, भूजलातील पाण्यावर हा परिणाम दिसून येतो, जी अतिशय गंभीर बाब आहे.

औद्योगिक कारखान्यांपेक्षाही जास्त, आजूबाजूला असलेल्या वसाहती मधून येणार्‍या सांपडपाण्यामुळे तसेच नागरिकांच्या दुर्लक्षामुळे भूजलाची गुणवत्ता कमी झालेली दिसून येते.

संशोधनाच्या वेळी, काही पाण्याच्या नमुन्यामध्ये पुढील कारणांमुळे प्रदूषण दिसून येते.

१. विहीरी (open wells) या उघड्या असल्याने, तसेच त्यांच्यावर कुछल्याही प्रकारचे आच्छादन नसल्यामुळे, अनेक प्रकारचा घन कचरा तसेच आजूबाजूचे सांडपाणी झिरपल्याने या विहीरींच्या पाण्याची गुणवत्ता ढासळलेली दिसते. भिमनगर तसेच कानसई गावांमध्ये विहीरीपासून जवळच अंतरावर ड्रेनेज लाईन जातांना दिसते जिचा परिणाम पाण्याच्या गुणवत्तेवर होतो तसेच मोखिली गावातील विहीर ही चिळलोळी- मोखिली औद्योगिक क्षेत्रापासून सर्वात जवळच्या अंतरावर आहे, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकवस्तीतून येणारे सांडपाणी, तसेच कारखान्यांमधून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी या दोघांचाही परिणाम या विहीरीतल्या पाण्याच्या गुणवत्तेवर झालेला दिसतो. तीनही विहीरींचे पाणी हे पिण्यायोग्य तर नाहीच परंतु इतर कुठल्याही उपयोगाकरता न वापरण्यासारखे आहे.

२. हातपंपाचे पाणीही आजूबाजूच्या परिस्थितीमुळे प्रदूषित झालेले आहे. दोनही हात पंपाच्या परिसरामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य वसलेले आहे. कानसई हातपंपाच्या क्षेत्रामध्ये, आजूबाजूचे नागरिक सरळ घनकचरा फेकतांना दिसतात त्यामुळे तेथील पाणी प्रदूषित झाले आहे तसेच लादी नाका हातपंपाच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असून, नागरिकांनी पूर्णपणे दुर्लक्षित केलेला असा आहे, या हातपंपाच्या आजूबाजूला सारखे पाणी साचून गवत तसेच शेवाळ्याची निर्मिती झालेली दिसते, हे पाणी सुध्दा कुठल्याही वापराकरता न वापरण्यासारखे आहे.

विहीरी, हातपंप व्यतिरिक्त बोअरवेल ही या भागात दिसून येतात. ८० टक्के बोअरवेल या खाजगी मालकीच्या असल्याने त्या तुलनेने कमी प्रदूषित झालेल्या दिसून येतात. या पाण्याची गुणवत्ता ही विहीरी व हातपंपाच्या पाण्याच्या तुलनेत चांगली आहे. आजूबाजूची परिस्थिती तसेच बोअरवेल या मेंटेन केलेल्या आहेत. या पाण्याचा उपयोग दैनंदिन कामाकरता केला जावू शकतो.

भूजल स्त्रोतांची अशी परिस्थिती पाहता, त्यांच्या संवर्धना करता काही सूचना पुढीलप्रमाणे आहेत -

१. विहीरी, हातपंपाच्या क्षेत्रामध्ये स्वच्छता आणि त्याचे संवर्धन करणे अतिशय महत्वाचे आहे. (Cleanliness & Maintenance)
२. विहीरीवर आच्छादनांची गरज आहे.३. आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक भागामध्ये सार्वजनिक कचराकुंड्यांची आवश्यकता आहे.
४. सॅनिटरी फॅसिलिटीजची अत्यंत गरज झोपडपट्ट्यांमध्ये आहे.
५. वेळोवेळी पाण्याचे परिक्षण करण्याची गरज आहे. स्थानिक अधिकार्‍यांनी वेळोवेळी आजूबाजूच्या पाण्याच्या स्त्रोतांकडे लक्ष देवून ते मेंटेन कसे राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
६. सर्वात महत्वाचे, लोकांमध्ये पर्यावरणाची, जलस्त्रोतात आणि त्यांचे संवर्धन करण्याची जाणीव करून देणे अतिशय महत्वाचे आहे.

वरील गोष्टी केल्यानंतरच या पाण्याचा वापर पुढील काळात करता येवू शकेल.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading