भूजल व्यवस्थापनाची गरज


आणि ते पाणी जिरल्यामुळे गावातील पूर्ण बोअरवेल व हातपंप यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जवळपास २००-२५० mtr पर्यंत त्याचा फरक जाणवायला लागला आहे. motor running time वाढला. बंद हापस्यांना पाणी आले, आणि हेच पाणी याच प्रमाणात जिरत राहिल्यास ३ करोड लिटर पेक्षा अधिक पाणी गावाच्या भूजलात जिरेल.

आमचे गाव बोकुड जळगाव हे एक डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आणि पाण्याने, जंगलाने, नैसर्गिक साधनांनी संपूर्ण अशी ओळख असलेले गाव म्हणून प्रसिद्ध होते. ही मागच्या २५ वर्षांपूर्वी असलेली परिस्थिती, जेथे केळी, ऊस, गहू, अशी ’पाणीदार’ पिके जोमात डोलत होती. मर्यादित विहिरींची संख्या जास्त पाणी पातळी कमी उपसा व तरी हिरवेगार रान आणि गावाला प्यायला आणि वापरायला मुबलक पाणी होते. जसे जसे विसावे शतक संपत आले, एकविसाव्या शतकात प्रवेश करते वेळी वातावरणात झालेले बदल, पर्जन्यमानात कमी, घटलेली पाणी पातळी आणि आलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे पाणी उपसा ज्याचा प्रत्यक्ष परिणाम पीक पद्धतीवर झाला / होत गेला. पहिल्या दशकात सरासरी पर्जन्य व त्यामुळे खालावत गेलेली पाणीपातळी या सर्वांमुळे पिके व पाठोपाठ उत्पन्न घटत गेले. केळी आणि ऊस याच्या ऐवजी मोसंबी आली. कालांतराने अजून अजून पाणी कमी पडायला लागल्याने तेच शेत कापूस, तूर, मका, बाजरी, मूग अशा भुसार पिकांवर आले. संकरीत बियाणे ज्यांनी आणलेले रोग, त्यांची फवारणी आणि निगराणी करता करता शेतकर्‍यांना आलेला फेस या सर्वाने शेतीचे परिणामी कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले.

२०१३-१५ या दोन वर्षात पावसाचे प्रमाण खूप कमी झाले. ज्यामुळे भीषण दुष्काळाला गावकरी किंवा सर्वाना सामोरं जाव लागलं. तेव्हा लोकांना थोडी जाणीव झाली की, काहीतरी काम व्हायला हवं.

आता गावकरी किंवा माणसाचा सध्या असा स्वभाव बनला आहे की, एक तर तहान लागल्यावर पाणी शोधायचे, विहीर खणण्याची किंवा पर्यायी मार्ग शोधायचा. आता दुष्काळात घर चालवण्याइतपत कमाई होत नसलेली व्यक्ती स्वत: पाण्यासाठी अजून खर्च करण्याच्या तयारीत नसला की पर्याय शोधतो. मग काय? तर गावाजवळ औद्योगिक परिसर आहे. चितेगाव, वाळूंज MIDC मध्ये कंपनी मध्ये तात्पुरती चाकरी करायची. वेळ मारून न्यायची असा रास्त शेतकर्‍यांनी किंवा तरुणांनी क्रम सुरु केला. ज्यामुळे चूल बंद पडली नाही, परंतु पाण्यासाठीची गंभीरता सुद्धा लोप पावली.

गावकरी सर्व आपापसात चर्चा करतात परंतु यावर कुणी काम करायचं हे लोक, सरकार, ग्रामपंचायत यांच्यावर जबाबदारी लोटायचं प्रकरण सुरु झालं. पिण्याच्या पाण्याची तात्पुरती टँकर्स सुरु झाली, आणि महत्वाच्या मुद्द्याला बगल मिळाली ते म्हणजे भूजल व्यवस्थापन.

अचानक आलेले तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण, Mass Production या सर्वांमुळे तंत्रज्ञान स्वस्त झाले, पूर्वी १०० फूट बोअर घेणे ज्याला अशक्य वाटायचे तोच व्यक्ती आता एकदा गाडी आली की ३-४ बोअर घेतो. जमिनीची झालेली छिन्नविच्छिन्न चाळणी आणि परिणामी खालावलेली पातळी हे आम्हाला पुढचे दृश्य दाखवीत होते. ज्याचे परिणाम पुढच्या पिढीला परवडणारे नाही. एकच प्रश्न नेहमी पडतो, “ Are we giving same or worse , what we got from our ancestors to our descendants?”

अशा प्रकारे जर पाणी उपसा सुरु राहिला तर आता सध्या ज्या प्रमाणे पाणीपातळी खालावत चाललेली आहे ती पातळी पूर्णत: संपण्यामध्ये जास्त कालावधी लागणार नाही. जे येणार्‍या पिढीसाठी धोकादायक ठरेल. आमच्या गावामध्ये २००७ साली गावामध्ये पंचायत नळ योजना आली होती. पण ती शासकीय अडचणी आणि गावातील Contractor मुळे पूर्ण झाली नाही. त्याचा परिणाम असा झाला आता सद्यस्थितीला जवळपास प्रत्येक घरामध्ये बोअरवेल आहे. सुरवातीला बोअरवेल ची खोली ही १५०-२०० फूट असायची आता हळूहळू वाढत जाऊन ती ३०० -४०० फूटापर्यंत जाऊन पोहोचली आहे.

मनुष्याची गरज शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर जी भावना येते तशी भावना आम्हाला जाणवली की, आता नाही तर कधीच नाही त्यासाठी आम्ही जलसंधारण कामासाठी माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले. सुरवातीला एक ते दोन NGO शी बोलणे झाले पण त्यांचे म्हणणे असे होते की, तुम्हाला एखादी अशी कंपनी बघावी लागेल की जी CSR मध्ये तुमच्या गावात काम करायला तयार असेल.

यासाठी आम्ही तरुणांनी मिळून चर्चा करण्यास सुरवात केली. त्यामध्ये आम्हाला नामदेव नागे या व्यक्तीची वेळोवेळी मदत मिळाली. व त्यांनी आम्हाला असे सुचविले की, तुम्ही पुनर्भरणाचे काही तरी काम केले पाहिजे आम्हाला ते पटले. त्यासाठी सुरवात ही आम्ही आमच्या स्वत:च्या बोअरवेल पासून केली. त्यामध्ये आम्ही फिल्टर जोडून बोअरवेल मध्ये पावसाचे छतावरील पाणी सोडले. आम्हाला सुरवातील वाटले की आम्ही हे काम केल्यावर गावातील लोक सुद्धा हे करायला तयार होतील पण त्या उलट घडले. त्यांचे म्हणणे होते की छताचे पाणी बोअरवेल मध्ये सोडल्याने त्यात गाळ होतो व पाणी खराब होते (गडूळ होते). व त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट माझे नुकसान होईल. आम्हाला नाही करायचे पुनर्भरण अशी उत्तरे मिळू लागली.

या कामा बरोबर आम्ही जलसंधारण कामासाठी माहिती गोळा करीत असताना Acwadam ही संस्था गावामध्ये काम करण्यास तयार झाली. आणि योगायोग असा की, ते जेव्हा तयार झाले तेव्हा उन्हाळा सुरु होता व त्यांची कार्यशाळा ही आम्हाला करायला मिळाली, ज्यामध्ये आम्हाला गावात काय काय काम करायचे व कशाप्रकारे करायचे याची माहिती मिळाली. खडकाबद्दलही ही माहिती मिळाली.

Acwadam ने १६ मे २०१६ रोजी गावात पहिली भेट दिली. व तेथून जलसंधारणाच्या कामाला सुरवात झाली.

या व्यतिरिक्त आम्ही गावाच्या पातळीवर गावातील भूजल पातळी वाढविण्यासाठी कामाला सुरवात केली. २००७ साली पंचायत नळ योजने अंतर्गत सार्वजनिक विहीर घेण्यात आली होती. तिचा वापर कुठेही होत नव्हता व त्याची पाईपलाईन सुद्धा गावापर्यंत होती. व ठिकठिकाणी फुटलेली होती जी जोडते वेळी लोकांचे टोमणे आम्हाला मिळत होते. ते पाईपलाईन जोडण्याच्या कामाला आम्हाला जवळपास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागला. ते पूर्ण झाल्यावर ते पाणी आम्ही गावातील सार्वजनिक आड होता त्यामध्ये आजूबाजूच्या घरातील सर्व काडी कचरा येत होता. तो उन्हाळ्यात काढला होताच. मध्ये पाणी त्यात सोडले. तर आता त्यात दररोज दोन लाख लिटर पाणी पडते व ते जिरते. आणि ते पाणी जिरल्यामुळे गावातील पूर्ण बोअरवेल व हातपंप यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जवळपास २००-२५० mtr पर्यंत त्याचा फरक जाणवायला लागला आहे. motor running time वाढला. बंद हापस्यांना पाणी आले, आणि हेच पाणी याच प्रमाणात जिरत राहिल्यास ३ करोड लिटर पेक्षा अधिक पाणी गावाच्या भूजलात जिरेल.

RTI ने आम्हाला असे कळाले की, ग्रामपंचायत ने मागच्या उन्हाळ्यात टँकरने ५० लाख लिटर पाणी गावाला पुरवले, परंतु आम्ही केलेल्या या एका छोट्याश्या कामामुळे ५-६ पट जास्त पाणी भूजलात जातंय.

तर एकंदरीत सांगायचं झाल्यास भूजल व्यवस्थापनाची गरज ही वाढती लोकसंख्या, नैसर्गिक साधन संपत्तीचा भोगवादी वापर / दुरुपयोग, तंत्रज्ञानाचा अति वापर, खालावती पातळी, लहरी मान्सून, बदलेलेली पिक पद्धती परिणामी बदलेली जीवनशैली या सर्वांमध्ये दडली आहे.

आणि ही गरज मिटविण्यासाठी पाणी जिरविण्यासोबतच उपश्यावर देखील नजर गेली पाहिजे. पाणी कितीही जिरवले, परंतु उपसा दुप्पट केला की, सर्व काम पाण्यात गेलं असचं होतं. या सर्व गरजा ओळखून काम करायला हवे. अशी आमची धारणा आहे. भारतात ६ लाख खेडी आहेत, आणि जवळपास ४ लाख ग्रामपंचायत. आमची अशी धारणा आहे की प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक चळवळ उभी राहिली तर संपूर्ण भारत पाणीदार होण्याच्या मार्गावर वाटचाल करेल.

शेवटी पाणी फाउंडेशन च्या शीर्षक गीतामधले काही शब्द गुरु ठाकूर यांनी अतिशय समर्पक लिहिले आहे, जे भूजल व्यवस्थापनाची गरज या मुद्द्याला सरळपणे मांडतात.

पिचलेला विझलेला टाहो
कधी न कुणा कळला
तळमळलीस तू करपुनी
हिरवा पदर तुझा जळला
छळ केला पिढीजात तुझा
ग उखडून वनराई
अपराध किती झाले पण
आता रहण तुला आई
धन्यवाद !!!

हरी आणि केदार.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading