माझी थ्री गॉर्जेस धरणाला भेट

22 Oct 2017
0 mins read

नदीच्या दोन बाजूला (12 + 14) प्रत्येकी 700 मॅगा वॅट क्षमतेच्या 26 जनित्राद्वारे आणि भुयारी जलविद्युत केंद्रात तितक्याच क्षमतेच्या 6 जनित्राद्वारे एकूण 22400 मेगा वॅट क्षमतेची विद्युत निर्मिती करण्यात येत आहे. जगातील हे सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे. या काँक्रीट ग्रॅव्हिटी डॅमची लांबी 2 कि.मी आहे आणि बुडीत क्षेत्र जवळपास 1 लक्ष हेक्टर म्हणजेच जायकवाडी जलाशयाच्या तिप्प्ट आहे.

चीन हा एक आशिया खंडातील दक्षिण पूर्व बाजूंनी प्रशांत महासागराने वेढलेला विशाल देश आहे. या देशाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ जवळपास 96 लक्ष चौ.कि.मी (696 कोटी हेक्टर) म्हणजेच भारताच्या तिप्पट आहे. हिमालय पर्वताच्या पलिकडील बाजूस चीन हा देश पसरलेला आहे. सहाजिकच चीनमधील सर्व नद्या उत्तरेकडून उगम पावून महासागराला मिळण्यासाठी आग्नेय दिशेला वाहतात. या देशाची समुद्र सपाटी पासून सरासरी उंची पश्‍चिमेकडून 4000 मीटरपासून पूर्वेकडे 100 मीटर या मर्यादेत आहे. एकूण क्षेत्रफळाच्या केवळ 13.5 टक्के म्हणजे 130 द.ल.हेक्टर जमीन शेती योग्य आहे. प्रत्याक्षात शेतीखाली असणारी जमीन 96 द.ल. हेक्टर (10 टक्के) आहे. चीमचे सरासरी पर्जन्यमान 650 मि.मी आहे. दक्षिण पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण 2000 मि.मीच्या पुढे जाते. यांगत्सी नदीच्या खोर्‍यातील दक्षिणेकडील भागात 1000 मि.मी पेक्षा जास्त पाऊस पडतो. उर्वरित चीनमध्ये (उत्तर, इशान्य आणि मध्य) पडणारा पाऊस हा 400 ते 800 मि.मीच्या दरम्यान असतो. दक्षिणेकडे मे ते ऑगस्ट तर उत्तरेकडे जून ते सप्टेंबर हे महिने पावसाचे असतात. शेतीचे मोजमाप मू = 6.7 गुंठा या परिमाणात केले जाते. एका कुटुंबाकडे सरासरी 1.2 एकर जमीन आहे.

चीनमध्ये 50000 पेक्षा जास्त नद्या (100 चौ.की.मी पेक्षा जास्त ) आहेत. यांगत्सी ही चीनमधील सर्वात मोठी नदी (6300 कि.मी) असून या नदी खोर्‍यातून वर्षाकाठी 1000 अब्ज घमी पाणी प्रवाहित होते. येलो (पीत) नदी ही चीनमधील दुसर्‍या क्रमांकाची (5464 कि.मी) नदी असून या नदीतून वर्षाकाठी 66 अ.घ.मी पाणी प्रवाहित होते. या देशामध्ये पावसाद्वारे वर्षाकाठी उपलब्ध होणारे एकूण पाणी 6190 अ.घ.मी आहे आणि त्यापैकी वर्षाकाठी सरासरी 2700 अ.घ.मी पाणी (1 फूट उंचीचे) नद्यांमधून प्रवाहित होते तर 1300 अ.घ.मी भूजलात रूपांतरित होते. यामध्ये पावसामुळे 98 टक्के तर बर्फ वितळल्यामुळे 2 टक्के असते. चीनची प्रति माणशी पाण्याची उपलब्धी 2300 घमी आहे आणि ती जक्षाच्या तुलनेत 1/4 आहे. दक्षिण चीन आणि नैऋत्य चीन या भागात जवळपास 80 टक्के पाणी उपलब्ध आहे तर या भागात 55 टक्के लोकसंख्या आणि 36 टक्के शेती आहे. चीनच्या दक्षिण भागातील दर माणशी पाणी उपलब्धी 20000 घमी पेक्षा जास्त आहे तर उच्चत चीनमध्ये हे प्रमाण 200 घमीच्या आसपास आहे.

दक्षिणेकडे पूर येतात तर उत्तरेकडे दुष्काळी स्थिती असते. जवळपास 75 टक्के नदीतील प्रवाह हा पावसाळ्याच्या (जुलै ते सप्टेंबर) पूर प्रवण काळात वाहून जातो. पाऊस हंगामी आहे आणि पायाची उपलब्धी विषम आहे. ही परिस्थिती भारताशी आणि महाराष्ट्राशी थोडीशी मिळती जुळती आहे. भारतामध्ये उत्तरेकडील 30 टक्के क्षेत्र व्यापणार्‍या गंगा, ब्रम्हपुत्रा नदी खोर्‍यात पाण्याची उपलब्धी देशातील एकूण पाण्याच्या 60 टक्के आहे. या खोर्‍यातील दरडोई पाण्याची उपलब्धी 2000 घमीच्या आसपास आहे तर दक्षिण भारतातील कावेरी खोर्‍यातील दरडोई पाण्याची उपलब्धी 500 घमी त्या आसपास आहे. गुजरात राज्यातील साबरमती नदी खोर्‍यातील दरडोई पाण्याची उपलब्धी 250 घमी पेक्षा जास्त नाही. महाराष्ट्रातील पश्‍चिम वाहिनी (कोकण) उपखोर्‍यात दरडोई पाण्याची उपलब्धी अवघी 100 घमी पण नाही. हंगामी व स्थळ आणि काळाच्या परिमाणात विषम असणार्‍या पावसाच्या प्रदेशात पाण्याच्या लहान मोठ्या अगणित साठवणी निर्माण करणे हे विकासाला कवेत घेण्यासाठीचे उत्तर असते. चीन या देशाने नेमके हे मर्म जाणले असून याच दिशेने प्रवास करून जवळपास लहान मोठी 85000 पेक्षा जास्त जलाशये निर्माण केली असल्याचे कळते. चीन या देशाची जलविद्युत निर्मिती क्षमता जवळपास 4 लक्ष मे.वॅट (जगात सर्वात अधिक) आहे. चीनचे 90 टक्के भौगोलिक क्षेत्र शेतीच्या दृष्टीने अनुत्पादित आहे. भात, गहू, मका, सोयाबीन, बार्ली, चहा, कापूस ही काही प्रमुख पिके आहेत.

180 लक्ष चौ. कि.मी पाणलोट क्षेत्र असलेली यांगत्सी नदी उत्तर तिबेटच्या हिमाच्छादीत पर्वतातून उगम पावते आणि चीनच्या नैऋत्य भागातून वाहात, जवळपास 200 कि.मी लांबीच्या खोल दरीतून (थ्री गॉर्जेस) वाहात जावून इशान्य दिशेला शांघाई या शहराजवळ प्रशांत महासागराला मिळते. या 200 कि.मी लांबीत तीन अति अरूंद आणि अति खोल ( सुमारे 10 .कि.मी, 45 कि.मी आणि 75 कि.मी) दर्‍या आहेत आणि या दर्‍यांना (कुतांग, यू आणि झिलींग) पोटात घेणारे धरण म्हणजेच थ्री गॉर्जेस डॅम आहे. या धरणाच्या नावाच्या पाठीमागे हे नैसर्गिक सत्य दडलेले आहे. नैऋत्य चीन मधील यांगत्सी ही ताकदवान नदी आणि शेजारी इशान्य चीनमधील पीत नदी या दोन विशाल नद्या चीनच्या जीवनदायिनी आहेत असे म्हणले तर अतिशयोक्ति वाटू नये. शेती आणि उद्योग आगर असणारा हा चीनचा सुपीक प्रदेश आहे. साधारणत: चीन वा कॅनडा या देशाच्या आकारमानाच्या 1/5 पाणलोट क्षेत्र असणार्‍या यांगत्सी या नदी खोर्‍यामध्ये चीनची 1/3 लोकसंख्या वास करीत आहे. देशाला लागणारे 40 टक्के अन्नधान्य आणि 70 टक्के भात या नदी खोर्‍यात पिकतो. चीनच्या एकू़ण औद्योगिक उत्पादनाच्या जवळपास 40 टक्के उत्पादन यांगत्सी नदी खोर्‍यात होते असे सांगण्यात आले. भारतातील कावेरी नदी खोर्‍याने तामिळनाडू राज्याच्या 1/3 भाग व्यापलेला आहे. पण या राज्याची 2/3 अर्थव्यवस्था या कावेरी खोर्‍यावर आधारलेली आहे असे समजते. मोठ्या नद्यांचे आणि त्यात असणार्‍या पाण्याचे आर्थिक सामर्थ्य किती मोठे असते याची या दोन उदाहरणावरून कल्पना येते.

यांगत्सी नदीचे खोरे चीनची जीवनदायिनी आहे हे सत्य एका बाजूला असताना याच नदीने भयावह असे पूर निर्माण करून खोर्‍यातील लोकांचे जीवन उध्वस्त केल्याचा इतिहास पण न विसरण्यासारखा आहे. 20 व्या शतकात या खोर्‍याला पाच वेळा अतितीव्र अशा पुराचा वेढा पडला होता आणि त्यामध्ये जवळपास 3 लक्ष लोक मृत्यूमुखी पडले आणि लाखो लोक बेघर झाले. इ.स.पूर्व 5 व्या शतकापासून चीनच्या शासनकर्त्यांनी या नदीच्या पुराला, मातीच्या तटबंदीने आटोक्यात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करूनसुध्दा पुराच्या विनाशापासून सुटका करून घेण्यात त्यांना यश संपादन करता आले नाही.

1920 साली प्रथमत: पुरावर नियंत्रण मिळविण्याच्या पारंपारिक पध्दतीला दूर सारून नदीचा प्रवाह अडविणारे बहुउद्देशीय विशालकाय धरण बांधण्याची अभियांत्रिकी संकल्पना मांडण्यात आली. जवळपास नदी खोर्‍यातील 1 कोटी लोकांना पुरापासून सुरक्षितता देण्याच्या उद्देशातून थ्री गॉर्जेस धरणाचा जन्म झालेला आहे. या बरोबरच 20 हजार मेगा वॅटपेक्षा जास्त जलविद्युत निर्मिती करून औद्योगिक विकास घडविणे आणि नदीपात्रातून हजारो कि.मी. ची जलवाहतूक करणे ही काही प्रमुख उद्दीष्ट्ये नजरेसमोर ठेवण्यात आली. समुद्र सपाटीपासून 185 मी. उंचीच्या धरणामुळे त्या पाठीमागचे जलाशय 600 कि.मी लांबीत पसरले असून त्यामुळे 10 लक्ष लोकांना विस्थापित व्हावे लागले. यांगस्ती नदीच्या 1954 च्या पुराने 30 हजार लोक मृत्युमुखी पडले आणि 10 लक्ष लोक बेघर झाले. या घटनेतून थ्री गॉर्जेस धरण बांधण्याची निकड पुढे आली आणि चेअरमन माओ त्से तुंग यांनी या विचाराला वेग दिला.

निसर्गाला कवेत घेणार्‍या या वास्तूच्या निर्मितीकडे चीनने जल विकास प्रकल्प निर्मितीमध्ये जाणकार असणार्‍या जगातील अनेक देशांची (अमेरिका, रशिया, कॅनडा इ.) मदत घेतली. त्याचवेळी चीनने अनेक देशांनी केलेल्या विरोधाचा भक्कमपणे सामना केला पण धरण निर्मितीच्या ध्येयापासून ते ढळले नाहीत. देशांतर्गत लोकांकडून पण विरोध झराला. 1992 मध्ये चीनच्या संसदेतील जवळपास 1/3 सदस्यांनी धरण बांधणीच्या प्रस्तावाला विरोध केला होता. चीनच्या शासनकर्त्यांनी अंतर्गत विरोध मोडून काढून जवळपास 70 वर्षाच्या प्रयत्नाला फलद्रूप करण्याचा निर्धार केला. भूकंप प्रवणता, धरण सुरक्षितता, जलाशयातील गाळ संचयता, लाखो लोकांचे विस्थापन, पर्यावरणीय प्रश्‍न असे महत्वाचे मुद्दे घेवून या प्रकल्पाला जागतिक स्तरावर मोठा विरोध झाला. मोठे नाव, मोठा पैसा, नाममात्र लाभ आणि काहींचाच फायदा करणारे स्मारक उभारण्याचा चीनने वेडेपणा करू नये अशी पण भाषा अनेकांनी केली. लाखो लोकांचे पुनर्वसन करून विस्थापितांना किती लवकर मूळ जागेवरून हलविले जाईल याचा एक पथदर्शी प्रयोग चीन शासनाने धरणाच्या बांधकामाला सुरूवात करण्याच्या दोन ते तीन वर्षे अगोदरच करून दाखविला होता.

1991 मध्ये अल्पशा काळात 10 हजार लोक व्यवस्थितपणे पुनर्स्थापित करून समाजिक क्षेत्रातील क्षमता चीनने जगासमोर आणल्याच्या नोंदी पण वाचण्यात येतात. दरम्यानच्या काळात 1991 च्या पुराने जवळपास 3 हजार लोकांचा बळी घेतला. या पार्श्‍वभूमिवर पुरापासून संरक्षण मिळविण्यासाठी थ्री गॉर्जेस धरण तातडीने बांधण्याची गरज, चीन तर्फे जागतिक समुदायासमोर मांडण्यात आली. या प्रकल्पाला विरोध करणारे चीन देशातील अनेक जाणकार होते आणि ते त्यांच्या विचारापासून विचलित होत नव्हते. 1992 मध्ये Amsterdam या ठिकाणी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय जल लवादामुळे थ्री गॉर्जेस डॅमच्या विरोधातले प्रकरण मांडण्यात आले. विस्थापितांचे हक्क आणि त्यांच्या गरजांकडे पुढे चालून धरण निर्माते दुर्लक्ष करतात असा शेरा मारून लवादाने प्रकल्पाच्या विरोधात निकाल दिलेला होता. जागतिक बँक आणि इतर आर्थिक मदत करणार्‍या संस्था प्रकल्पाला आर्थिक मदत करण्याच्या विरोधात गेलेल्या असतानासुध्दा 70 वर्षाच्या वाद विवाद, नियोजन यातून बाहेर पडून 1993 मध्ये चीनी शासनाने 20 वे शतक संपण्याच्या आत थ्री गॉर्जेस डॅमचे बांधकाम प्रगतीपथावर राहील याचा निश्‍चय केलेला होता.

1993 ला प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आणि 15 वर्षात म्हणजे 2009 पर्यंत नियोजित केलेल्या मुदतीच्या आत या प्रकल्पाचे काम पूर्ण करून त्यापासून नियोजित केलेले लाभ मिळविण्यासाठी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. यांगत्सी नदीवर इचांग शहराच्या जवळच वरच्या भागात थ्री गॉर्जेस डॅम निर्माण करण्यात आला आहे. या प्रकल्प निर्मितीमागील मुख्य उद्दीष्ट पूर नियंत्रण, जलविद्युत निर्मिती आणि जलवाहतूक हे जरी असले तरी यापासून इतर अनेक लाभ जसे पर्यटन, पर्यावरण सुरक्षितता, सिंचन, दुष्काळ निवारण, औद्योगिक विकास, विकासाभिमुख पुनर्वसन, पर्यावरण शुध्दिकरण, मत्स्यपालन इ. मिळविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यांगत्सी नदीचे पात्र खोल आणि अरूंद असल्याने जलाशयाची रूंदी 1000 मीटर ते 1700 मीटर पर्यंत मर्यादित आहे. या जलाशयाची क्षमता 39.3 अ.घमी (महाराष्ट्रातील लहान मोठ्या सर्व जलाशयाच्या सध्याच्या एकूण साठवण क्षमते इतकी वा कोयना जलाशयाच्या 13 पट म्हणजेच 1300 टीएमसी आहे. गुजरातमधील सरदार सरोवर जलाशयाचा जीवंत पाणी साठा 5.8 अ.घमी आहे) आणि यापैकी पूर साठवण क्षमता 21.15 अ.घमी आहे.

10 वर्षातून एकदा ते 100 वर्षातून एकदा येणार्‍या तीव्रतेचा पूर जलाशयात साठवून ठेवण्याची क्षमता निर्माण करण्यात आलेली आहे. थ्री गॉर्जेस प्रकल्पामध्ये धरण, सांडवा, धरण पायथ्याशी दोन बाजूला दोन जल विद्युत केंद्रे, दुहेरी पाच टप्प्यातील शीपलॉक, शिप लीफ्ट आणि जल वाहतूकीच्या सोयी इ. चा अंतर्भाव होतो. 1993 ते 97 या काळात घळ भरणी करून नदी अडविण्यात आली. 1998 ते 2003 मध्ये जलाशयात पाणी साठवून विद्युत निर्मिती सुरू करण्यात आली आणि 2009 ला प्रकल्प पूर्ण करण्यात आला. धरणासाठी मजबूत पाया, बांधकामासाठी सोयीस्कर जागा इ. अनेक घटकांचा अभ्यास करून धरणाच्या 15 पर्यायी जागेतून, शेवटी नदीपात्र एका लहानशा निसर्ग निर्मित बेटामुळे दोन भागात (900 मी आणि 300 मी) विभागल्या ठिकाणी थ्री गॉर्जेस धरणाची जागा निश्‍चित करण्यात आली आहे.

बेटामुळे बांधकामासाठी नदी प्रवाह वळविणे सोपे झाले. म्हणून या नदीपात्रातील बेट ही निसर्गाकडून चीनला मिळालेली देणगी आहे असे म्हणले जाते. या कारणास्तव धरणाची जागा नदीपात्र सरळ असणार्‍या ठिकाणी ऐवजी वळणावर घेतलेली आहे असे अनुमान काढण्यास जागा आहे. स्थापत्य अभियांत्रिकीच्या नजरेतून धरणाची निवडलेली जागा आदर्श नसावी. धरणाचा पाया जलाभेद्य ग्रॅनाईट या रूपांतरित खडकात भक्कमपणे रोवलेला आहे. काँक्रीटमध्ये बांधलेल्या या धरणासाठी बाजूच्याच दुहेरी जल वाहतूकीसाठी खोदलेल्या कालव्यातील (शिपलॉक) ग्रॅनाईट खडकाचा वापर करण्यात आला आहे.

या धरणाचा जवळपास 500 मीटर लांबीचा सांडवा नदीपात्राच्या मध्यभागी आहे. सांडव्याची वहन क्षमता 1 लक्ष घमी प्रति सेकंदापेक्षा (102500 घमी प्रति सेकंद म्हणजेच 36 लक्ष क्युसेक्स) सरदार सरोवर प्रकल्पाच्या सांडव्याची क्षमता जवळपास 30 लक्ष क्युसेक्स आहे) थोडीशी जास्त आहे. हा प्रचंड प्रवाह तळातील दोन पातळीवरील 23 + 22 विमोचकाद्वारे नदीपात्रात खालच्या बाजूस ओतला जातो. या धरणामुळे यांगत्सी नदीतील इचांग शहरापासून वरच्या भागातील जलाशयामुळे जवळपास 660 कि.मी चा जलमार्ग जलवाहतूकीसाठी बाराही महिने कसल्याही अडथळ्याविना उपलब्ध झालेला आहे. धरण बांधण्याच्या पूर्वी नदी पात्रातील उंचवट्यामुळे जलवाहतूकीला अडथळे होते. शांघाई पासून जवळपास 2.5 कि.मीचा जलवाहतूकीचा मार्ग 10 हजार टन क्षमतेच्या बोटीने वाहतूक करण्यास उपलब्ध झालेला आहे. जलवाहतूक ही अतिशय स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणाला इजा न पोचविणारी असते. धरणाच्या डाव्या किनार्‍यावर दुहेरी वाहतूक करणार्‍या शिपलॉकच्या निर्मितीमुळे जलवाहतूकीची सोय उपलब्ध झालेली आहे. चीनच्या दृष्टीने ही फार मोठी उपलब्धी आहे. शिपलॉक कालव्यामुळे धरणाखालचे नदीपात्र आणि धरणाच्या पाठीमागील जलाशय पातळी यातील जवळपास 113 मीटर उंचीचा फरक पाच टप्प्यात ओलांडणे शक्य झालेले आहे. याच्याच जोडीला ही उंची एका टप्प्यामध्ये पार करण्यासाठी शिपलिफ्ट या टॉवरची निर्मिती करण्यात आलेली आहे. साधन सामग्रीची वाहतूक आणि पर्यटनाचा विकास या दोन्ही बाबी सहजपणे साध्य झालेल्या आहेत.

नदीच्या दोन बाजूला (12 + 14) प्रत्येकी 700 मॅगा वॅट क्षमतेच्या 26 जनित्राद्वारे आणि भुयारी जलविद्युत केंद्रात तितक्याच क्षमतेच्या 6 जनित्राद्वारे एकूण 22400 मेगा वॅट क्षमतेची विद्युत निर्मिती करण्यात येत आहे. जगातील हे सर्वात मोठे जलविद्युत केंद्र आहे. या काँक्रीट ग्रॅव्हिटी डॅमची लांबी 2 कि.मी आहे आणि बुडीत क्षेत्र जवळपास 1 लक्ष हेक्टर म्हणजेच जायकवाडी जलाशयाच्या तिप्प्ट आहे. धरणाचा सांडवा हजार वर्षात एकदा येणार्‍या पुराला वाहून नेण्याइतक्या क्षमतेचा आहे. नदीतील वार्षिक प्रवाह जवळपास 1 हजार अ.घमी आहे. पण पूर साठवण क्षमता मात्र 22.15 अ.घमी आहे. पुराची साठवण आणि पुराचा वेग कमी करून पुराची तीव्रता 30 टक्क्याने कमी करून पुराचे नियमन करण्याची सोय करण्यात आलेली आहे. जवळपास दीड कोटी लोकांना आणि 15 लक्ष हेक्टर शेतीला पुरापासून संरक्षण मिळालेले आहे. 40 अ. घमी क्षमतेचे जलाशय निर्माण करण्यासाठी अनेक शहरे, खेडी, शेतजमिनी, फळबागा आणि 28 हजार हेक्टर वन जमीन पाण्याखाली बुडालेली आहे. यासाठी सुमारे 1.13 द.ल. लोकांचे पुनर्वसन करावे लागले. यापैकी जवळपास 7 लक्ष लोकांचे पुनर्वसन जलाशयाच्या भोवती करण्यात आले.

1 लाखापेक्षा जास्त लोक शहरामध्ये स्थलांतरित झाली. पुनर्वसित झालेली शहरे, खेडी याचा दर्जा मूळ परिस्थितीपेक्षा फारच उच्च दर्जाचा राखण्यात आला आहे. बहुतांशी पुनर्वसन लोकांच्या इच्छेप्रमाणे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जमिनीला जमीन, घराला घर आणि नोकरीमध्ये प्राधान्य या तत्वाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे समजले. चीनमध्ये सर्व जमिनी सरकारी मालकीची आहे. साधारणत: 30 वर्षाच्या भाडेपट्ट्याने प्रत्यक्षात खेड्यात राहून शेती करणार्‍या शेतकर्‍यालाच जमीन दिली जाते. यामुळे धरणासाठी करावे लागणारे भूसंपादन सोपे, सोयीचे असणार. भारतात जमिनीची मालकी शेतकर्‍याकडे आहे. शेतकर्‍यांकडून जमीन संपादित करणे अवघड जाते. हा मूलभूत फरक आहे.

थ्री गॉर्जेस जलाशय नदी पात्रासारखे आहे. जलाशयाची सारसरी रूंदी 1 कि.मी पेक्षा कमी आहे. दुसर्‍या ठिकाणी जलाशयाची रूंदी 1.75 कि.मी पर्यंत वाढलेली आहे. जलाशयात साठणारा गाळ हा एक जलाशय निर्मितीतील कळीचा मुद्दा होता. जलाशयामध्ये पाणलोटातून गाळ येणे ही एक नेसर्गिक प्रक्रिया आहे. साठलेल्या गाळामुळे जलाशयाची क्षमता कमी होवू नये आणि जलवाहतुकीसाठी अडथळा निर्माण होवू नये यासाठी चार पाच बाबींचा अवलंब केल्याचे कळते. पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी तळातील विमोचकाद्वारे जलाशयाबाहेर काढणे, पावसाळा संपल्यानंतर नितळ पाणी जलाशयामध्ये साठविणे, पाणलोटामध्ये मृद आणि जल संधारणाचे प्रकल्प राहविणे, छोट्या मोठ्या उपनद्यांवर जलसाठे निर्माण करून वाहून येणार्‍या गाळाला अडविणे, पाणलोटात वन विकास करणे आणि पाचवी बाब म्हणजे जलाशयातील वाळू आणि गाळ यंत्राच्या सहाय्याने विविध प्रयोजनासाठी बाहेर काढणे या त्या योजना आहेत.

सप्टेंबर 17 च्या अळेरीस म्हणजेच पावसाळ्याच्या शेवटी आम्ही या प्रकल्पाला भेट दिली. त्यावेळी जलाशय पातळी अर्ध्यावर असल्याचे दिसले. जलाशय भरण्याच्या नियमानलीत भारत आणि चीन या दोन देशामध्ये वेगळेपण असल्याचे दिसून आले. पावसाळ्याच्या शेवटी भारतातील जलाशये पूर्ण पातळीपर्यंत असतात, कारण पावसाळ्यानंतर नदीपात्रात फारच अल्प प्रवाह असतो. भारतात धरणाचा पूर नि:सारणीचा सांडवा वरच्या पातळीवर असतो. थ्री गॉर्जेस डॅम साठी नदीच्या तळाजवळ पूर नि:सारण करणारी विमोचके ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील पुराचे गढूळ पाणी बाहेर काढता येते.

या प्रकल्पामुळे परिसरामध्ये पर्यावरणीय सुधारणा आणि वातावरणीय शुध्दता निर्माण झाल्याचा दावा ची सरकार करते. या परिसरात फिरल्यानंतर या दाव्याला विरोध करावासा वाटत नाही. मानवी अंगाने प्रकल्पग्रस्त लोकांचे पुनर्वसन करून त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीमध्ये स्थैर्य निर्माण केल्यामुळे लोकांचे हाल, त्यांची नाराजी इ परिस्थितीचे सहजासहजी दर्शन होत नाही असे म्हणले तरी चालेल. पूरामुळे होणारे अपघात कमी झाले, मनुष्यहानी वाचली, शेतीचे नुकसान टळले, जमिनीवर साचणारे आणि रोगराईस जन्म देणारी पाण्याची डबकी कमी झाली. साहजिकच संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला. जवळपास 22400 मे. वॅट क्षमतेची स्वच्छ ऊर्जा उपलब्ध झाली.

यामुळे जाळल्या जाणार्‍या कोळशात घट झाली. कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डाय प्रादुर्भाव कमी झाला आणि मानवाचे आरोग्य सुधारले अशीही मांडणी प्रकल्प निर्मात्याकडून केली जाते. विशाल जलाशय निर्माण झाले आहे आणि त्यामुळे इ. क्षेत्रात भरीव सुधारणा झालेली आहे. या खात्रीलायक जलसाठ्यामुळे यांगत्सी नदीतील पाणी उत्तर भागात वळविणे शक्य झाले आणि त्यामुळे भविष्यात येणार्‍या भूकंपाच्या हादर्‍यास तोंड देण्याची पुरेशी क्षमता भूगर्भीय खडकामध्ये आहे. थ्री गॉर्जेस धरण भूकंपाच्या रिष्टर स्केल ला पण स्थिर राहील याची काळजी घेण्यात आली आहे. युध्दासारख्या आपत्तकालीन परिस्थितीत धरण फुटले तरी खालच्या पात्रातील नदी पात्रात बराचसा पूर मावला जाईल याची योग्य ती काळजी नियोजनकर्त्यांनी घेतलेली आहे अशीही मांडणी ते करतात.

डॉ. दि. मा. मोरे , पुणे - मो : 09422776670

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading