पाऊलवाटा - प्रकाश वाटा - लोकसहभागातून जलसंवर्धन


रा स्व संघ जनकल्याण समिती आणि क्रिस्लिस फौन्डेशन पुणे यांनी एकत्र येऊन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील तलवाडा तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. गुडी पाडव्याला या कामाचे उद्घाटन झाले. सध्या 6 जे सी बी गाळ काढण्याचे काम करत आहेत.

जनकल्याण समिती चे सध्याचे अध्यक्ष उपेंद्र कुलकर्णी यांनी नांदेड येथील डा.मंठाळकर, प्रदीप वेसनेकर व परभणी चे अभियंता शंकर अजेगावकर यांच्या सोबत कामाची प्रगती पाहण्यासाठी तलवाडा येथे भेट दिली. 3 मे अखेर तीस हजार ट्रक्टर गाळ काढण्यात आला आहे. 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील शेतकरी हा गाळ स्वत:हून आपल्या खर्चाने शेतात घेऊन जात आहेत. पुढील वर्षी या गाळाच्या परिणाम स्वरूप उत्पन्नात निश्चित वाढ होणार आहे. तसेच तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढल्यामुळे परिसरातील विहीरींना पाणी वाढणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न आगामी काळात सुटेल.

अवर्षणाचा फटका बसणार नाही असा विश्वास परिसरातील नागरिकांना वाटत आहे. गेवराई चे अभियंता दत्ता पत्की, हॉ.हेमंत वैद्य जनकल्याण समिती चे पूर्ण वेळ कार्यकर्ते प्रसाद देशमुख व अन्य दहा स्वयंसेवक रोज तेथील कामात लक्ष घालत आहेत. औरंगाबाद चे हेमंत जोशी जनकल्याण समिती चे कोषाध्यक्ष खानविलकर, नांदेड चे उपेंद्र कुलकर्णी व क्रिस्लिस फौन्डेशन ते प्रसन्ननगर चे सुनील कणवटे हे विचार विनिमयासाठी अन्य मदत उपलब्ध करण्यासाठी नित्य भेटी देत असतात. हे काम पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहे असा विश्वास जनकल्याण समिती चे अध्यक्ष उपेंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

जनकल्याण समितीच्या वतीने मराठवाड्यातील जनावरांसाठी 8 चारा छावण्या, 2 चारा डेपो, वन्य पशु पक्ष्यांसाठी रानात पाण्याची सोय मार्च पासून करण्यात आली आहे. 25 गावात जल कुंभ बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याच्या वितरणाची सोय चांगली झाली आहे. घनसावंगी तालुक्यातील दहीगव्हान येथे पूर्वी पाण्याचा फारसा प्रश्न नव्हता. यावर्षी या गावातील सर्व बोअर आटले आहेत. जनकल्याण समितीने चोवीस हजार लिटर ची पाण्याची टाकी आयआयटी दिल्ली च्या मदतीने तयार करून दिली आहे. त्या टाकीचा सध्या टँकरने पाणी आणून वितरणासाठी चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवण्याचा विचार केला आहे. गावातील एक नाला खोल व रूंद करून पावसाचे पाणी साठवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. एक जे सी बी द्वारे नाला खोल करण्याचे सध्या काम सुरू आहे. तीनशे मीटर चे काम झाले आहे. एक किलोमीटर नाला खोल झाल्यावर तीस हजार घन मीटर पाणी उपलब्ध होणार आहे.

नांदेडचे भूगर्भ शास्त्रज्ञ प्रदीप वेसनेकर यांनी भूजलाच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन या भेटी दरम्यान दिले. मे महिन्यात हे काम पूर्ण होईल असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला व पुढील वर्षी अवर्षणाच्या स्थितीत सुध्दा या गावाला पाण्याची समस्या भेडसावणार नाही.

जनकल्याण समितीच्या वतीने नेर तालुक्यातील सहा गावात पाणी साठवण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प राबवले जाणार आहेत. यासाठी जल वर्धिनी प्रतिष्ठान - मुंबई, श्री साई सेवा संस्था - मुंबई व अनेक दानशूर मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. किनवट तालुक्यातील आदिवासी भागातील एका गावासाठी पाणी साठवणीसाठी जलवर्धिनी प्रतिष्ठान ने आर्थिक मदत पाठवली आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल.

जलक्षेत्रात आढळणाऱ्या यशोगाथा वाचकांसमोर अनुकरणार्थ सादर करण्यात येत आहे.

(सुधाकर स्मृती कोषातर्फे)
श्री. उपेंद्र कुलकर्णी (मो. 09175073286)

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading