राजस्थानचे रजत जलबिंदू - 8

Published on
4 min read

श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर

जैसलमेर मरूभूमीतलं एक असं राज्य आहे, ज्याच्या नांवाचा डंका व्यापारी जगतांत वाजत असे. त्याकाळी इथे शेकडो उंटांचे काफिले रोज येत. आजच्या सिंध, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ईराण, इराक, आफ्रिका आणि दूर रशियाच्या कझाकिस्तान, उझबेकिस्तान ह्या ठिकाणचा माल इथे उतरत असे. इथल्या माणिकचौकांत आज भाजीबिजी विकली जाते. पण एके काळी इथे माणिक - मोती विकले जात होते. उंटांची रांग सांभाळणारे कतारिये इथे लाखों रूपयांचा माल उतरवीत - चढवीत होते. 1800 सालाच्या सुरूवातीपर्यंत जैसलमेर आपलं वैभव टिकवून होतं. तेव्हा इथली लोकसंख्या 35000 च्या आसपास होती - आज ती घटून जवळजवळ अर्धीच शिल्लक राहिली आहे.

परंतु नंतरच्या प्रचंड मंदीच्या काळात सुध्दा जैसलमेर आणि जवळपासच्या परिसरात तलाव बांधायच्या कामात मंदपणा आला नव्हता. गजरूप सागर, मूलसागर, गंगासागर, डेडासर, गुलाबतलाव, ईसरलालजीचा तलाव - असे एकापाठोपाठ एक तलाव बनवले गेले. ह्या शहरांत इतके तलाव बनले, की त्यांची नेमकी गणना होणही कठीण आहे. पूर्ण समजल्या गेलेल्या यादीत सुध्दा कोणीही फिरता फिरता आणखी दोन - चार नावं जोडून बसतो.

तलावांची ही सुंदर साखळी इंग्रज येईपर्यंत तुटली नव्हती. ह्या साखळीची मजबुती काही फक्त राजे, रावळ आणि महारावळ यावरच सोडलेली नव्हती... तर समाजाचा असा हिस्सा, जो आजच्या परिभाषेत आर्थिक दृष्ट्या कमजोर मानला गेला आहे, तो सुध्दा ह्या साखळीच्या मजबुतीला हातभार लावत होता.

मेघा गुरं राखायचा.... हा किस्सा 500 वर्षांपूर्वीचा आहे. गुरं घेवून मेघा भल्या सकाळी निघायचा. कित्येक कोस पसरलेलं सपाट - तापतं वाळवंट. मेघा दिवसभराचं पाणी आपल्याबरोबर एका कुपडीत म्हणजे मातीच्या चपट्या सुरईत घेवून जाई - संध्याकाळी परत येई. एके दिवशी त्याच्या कुपडीत थोडं पाणी शिल्लक राहिलं... मेघाला काय सुचलं कोण जाणे... त्याने एक छोटासा खड्डा खणला, त्यात कुपडीतलं पाणी ओतलं आणि आक च्या पानांनी खड्डा नीट झाकून टाकला.

चराईचं काम काय, आज इथे, उद्या आणखी कुठे. मेधा दोन दिवस त्या ठिकाणी येवू शकला नाही. तिसऱ्या दिवशी तो तिथे गेला... उत्सुक हातांनी आकची पानं हळूच बाजूला सारली. खड्ड्यांत पाणी नव्हतं. पण थंडगार हवा बाहेर आली. मेघा पट्कन उद्गारला - वाफ. मेघानं मग विचार केला, की इतक्या उन्हात थोड्याशा पाण्याचा ओलावा जर टिकून राहू शकतो. तर मग इथे तलाव सुध्दा बनू शकेल.

मेघाने एकट्यानेच तलाव खणायला सुरूवात केली. आता तो रोज आपल्याबरोबर कुदळ - फावडंही आणू लागला. दिवसभर एकट्यानेच माती खणायची आणि बांधावर टाकायची. गाईसुध्दा जवळपासच चरत राहायच्या. मेघाकडे भीमासारखी ताकद नव्हती, पण भीमशक्तीसारखा संकल्प जरूर होता. दोन वर्षे त्याने एकट्यानेच काम नेटाने रेटलं. आता सपाट वाळवंटांत बांधाचा मोठा घेर लांबूनच नजरेला दिसू लागला होता. बांधाची बातमी आजूबाजूच्या गावांनाही लागली. आता रोज सकाळी गावाची पोरं आणि इतर लोकही मेघाबरोबर यायला लागले. सगळे मिळून काम करीत. 12 वर्षे लोटली तरी अजूनही त्या विशाल तलावांच काम चालूच होतं - पण मेघाचं आयुष्य मात्र संपलं. त्याची बायको सती गेली नाही. आता तलावावर मेघाऐवजी ती कामाला यायला लागली. सुमारे 6 महिन्यांनी तलाव पुरा झाला. बाल म्हणजे (हिंदीत) भाप मुळे तलाव बनवायला सुरूवात झाली, म्हणून त्या जागेचही नाव बाफ पडलं. पण पुढे बिघडून त्याचं बाप बनलं. गुराखी मेघाची समाजाने मेघोजी म्हणून आठवण ठेवली आणि तलावापाळीवरच त्याच्या नावाने सुंदर छतरी आणि त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ एक देवडी बनवली गेली.

बाप ही, बिकानेर - जैसलमेरच्या रस्त्यावर असलेली एक छोटीशी वस्ती आहे. चहा- कचोरीची 5-6 दुकानं असलेला एस.टी बसस्टँड तिथे आहे. बसगाडीच्या तिप्पट उंचीची पाल (पाळी - तळ्याचा काठ) बसस्टँडला लागून उभी आहे. उन्हाळ्यात पाळीच्या ह्या बाजूला 'लू' म्हणजे गरम हवेच्या लाटा चालतात, तर त्या बाजूला मेघाजीच्या तलावात पाण्यावर लाटा उठत असतात. पावसाच्या दिवसांत तर तलावांत लाखेटा (द्वीप बेट) बनतं. तेव्हा आजूबाजूच्या 4 मैलांच्या परिसरात पाणी पसरतं. मेघ आणि मेघराजा भलेही इथे कमी येत असतील, पण ह्या मरूभूमीत मेघाजीसारख्या लोकांची कधी वाण नाही पडली.

राजस्थानच्या तलावांची ही यशोदुंदुभी 'जसेरी' नावाच्या एका विलक्षण तलावाशिवाय पुरी होवू शकत नाही. जैसलमेरपासून साधारण 40 कि.मी दूर 'डेढा' गावाजवळ बांधलेल्या ह्या तलावाने पाणी अडवून धरायच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. चारही बाजूंनी तापणारं 'रणरणतं' वाळवंट आहे, पण जसेरी चं ना पाणी आटत, ना यश कमी होते. जाळ्या आणि देशी बाभळींच्या झाडांनी झाकलेल्या काठावर एका छोटासा सुंदर घाट आणि तलावाच्या एका कोपऱ्यात दगडाची सुंदर छतरी, बस, काही खास सांगण्यासारखं काही नाही मिळणार इथे - पण कुठल्याही महिन्यांत इथे जावं - स्वच्छ निळसर पाण्यात उठणारे तरंग दिसतील, पक्ष्यांचे थवे भेटतील. जसेरीचं पाणी आटत नाही. मोठ्यांतल्या मोठ्या दुष्काळात सुध्दा जसेरी चं हे यश जराही कमी झालेलं नाही.

जसेरी तलावही आहे आणि मोठी विशाल कुंईसुध्दा. ह्याच्या आगराच्या खालून कुंईसारखीच 'बिट्टू रो बल्लियो' - म्हणजे खडीची पट्टी गेलेली आहे. तलाव खोदतांना ह्या पट्टीटी नीट जाणीव ठेवली गेली आणि तिला कुठेही तडा जावू दिला नाही. अश्या प्रकारे ह्यांच्यात 'पालरपाणी' आणि 'रेजाणीपाणी' दोन्हींचा संगम होतो. आधीच्या वर्षीचं पाणी आटत नाही आणि वरून परत येणाऱ्या पावसाचं पाणी येवून मिळतं. जसेरी म्हणजे दरवर्षी पडणाऱ्या थेंबाचाच संगम आहे.

असं म्हणतात, की ह्या तलावाच्या मध्यभागी एक पायविहीर म्हणजे 'बावडी' सुध्दा आहे. आणि तिच्याच काठावर, तलाव बांधणाऱ्या 'पालीवाल' ब्राम्हण परिवाराकडून एक ताम्रपत्र लावलं गेलं आहे... पण अजून ते कोणीही वाचलेलं नाही, कारण तलावांत कायम पाणी भरलेलं असतं. ताम्रपत्र पाहायची किंवा वाचायची कधी संधीच मिळालेली नाही आहे. कदाचित जसेरी बनवणाऱ्यांनी फार विचारपूर्वकच ताम्रपत्र तलावाच्या मध्यभागी लावलं असावं. लोक ताम्रपत्राच्या ऐवजी चांदीसारख्या चमकणाऱ्या तलावालाच वाचतात आणि त्याचं यश पसरवीत जातात.

आसपासची एक - दोन नव्हेत, तर सात गावं ह्याचं पाणी घेतात. कित्येक गावाचं पशुधन ह्या जसेरीच्या संपन्नतेमुळे टिकून आहे. अन्नपूर्णे सारखे लोक ह्याचं वर्णन 'जलपूर्णा' असं करतात... आणि शिवाय ह्याच्या यशाची सर्वांत मोठी गोष्ट अशीही सांगतात, की जसेरीमध्ये अथांग पाण्याच्या बरोबरीनेच अथांग ममता सुध्दा भरलेली आहे.... आजपर्यंत ह्यांच्यात कोणीही बुडून मेलेलं नाही. 'साद' (शेवाळं) ह्यांतही आलेली आहे, पण तरीही, उंटावर बसलेला स्वारही बुडेल इतकी ह्याची खोली असूनही, अजूनपर्यंत ह्यांत कोणी बुडून प्राणाला मुकलेलं नाही. म्हणूनच जसेरीला 'निर्दोष तलाव' असंही म्हटलं जातं.

पाण्याची अशी निर्दोष व्यवस्था करणारा समाज, बिंदूमध्ये सिंधू पाहणारा समाज भल्याभल्या चिकित्सकांनाही हैराण करून टाकतो.

जल व अन्नाचा अमरपट्टा :

सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836

संबंधित कहानियां

No stories found.
India Water Portal - Hindi
hindi.indiawaterportal.org